पिंपळनेरचा शिक्षण समाजकारण, राजकारणातील महामेरू हरपला;कै.बापूसाहेब संभाजीराव पगारे यांचे अल्पशा आजाराने निधन
पिंपळनेर,दि.24(साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुस्कर)साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील महान व्यक्तिमत्त्वाचे,कै.बापूसाहेब संभाजीराव पगारे यांचे आज,दि.24 एप्रिल रोजी नाशिक येथील अपोलो हौस्पिटल मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले.ज्या बापूसाहेबांनी आपले जीवन झाडपाल्याशी,शेतीमातीशी आणि राजकारणाशी घट्टपणे बांधले होते,ते नेहमी कुसुमाग्रजांच्या शब्दांची आठवण करून देतः "साथ सोबत लागते कोणाला, माझेच आभाळ,माझीच धरती,वादळ घेऊन चाललो खांद्यावरती"हे शब्द त्यांच्या अंतरंगात खोलवर रुजले होते.बापूसाहेब म्हणजे करुणा आणि ममतेचा सागर होते,तर त्यांच्या अर्धांगिनी, सौभाग्यवती पुष्पलताताई या ज्ञानाची सरिता होत्या.या उभयतांचे जीवन अनेक संकटातून तावून सुलाखून निघाले,आणि त्यांचे शुद्ध सोन्यासारखे तेजस्वी जीवन सर्वांसाठीच एक आदर्श आणि प्रेरणास्रोत होते.आज केवळ पगारे कुटुंबावरच नव्हे,तर शिक्षण,राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रांतील अनेकांचा आधारवड हरपला आहे.एक मौल्यवान ठेवा,एक प्रेमळ मार्गदर्शक आज आपल्यातून कायमचा निघून गेला.त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबच नव्हे,तर त्यांची असंख्य नातीगोती शोकसागरात बुडाली आहेत. बापूसाहेबांच्या अचानक जाण्याने पगारे परिवार आतून पार तुटला आहे,कारण ते या कुटुंबाचे अनमोल रत्न होते.अॅडव्होकेट बापूसाहेब संभाजीराव पगारे हे एक आदर्श संस्थाचालक,प्रभावी वक्ते,ख्यातनाम लेखक आणि उत्कृष्ट कवी म्हणून सर्वदूर परिचित होते. त्यांना "ज्ञान सिंधू रत्न" पुरस्कार, "पिंपळनेर रत्न पुरस्कार" आणि आदर्श संस्थाचालक पुरस्कार यांसारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.त्यांचे हे दुःखद निधन अनेक हृदयात एक मोठी पोकळी निर्माण करून गेले आहे.बापूसाहेबांच्या पश्चात त्यांच्या सहधर्मचारिणी,तीन बंधू,भावजाया,तीन भगिनी, मेहुणे,एक सुपुत्र,दोन सुकन्या,सून,जावई आणि नातवंडांचा मोठा परिवार आहे.शब्दांकन:अंबादास बेनुस्कर पिंपळनेर